दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीपात्रात एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळले होते. हे सर्व अहमदनगर जिल्ह्यातील निघोज येथे वास्तव्यास होते. दरम्यान या सात जणांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आले होते. परंतु एक मोठा ट्विस्ट आता या प्रकरणात समोर आला आहे.
या सात जणांना नातेवाईंकानीच संपवलं असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना संशयित म्हणून अटक केली आहे. मोहन पवार (वय ४५), त्यांच्या पत्नी संगीता (४०, दोघे रा. खामगाव, ता. गेवराई), जावई श्याम फलवरे (२८), मुलगी राणी (२४), नातवंडे रितेश (७), छोटू(५) आणि कृष्णा (३, सर्व रा. हातोला, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) यांचे मृतदेह भीमा नदीत आढळले होते.
दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अधिक माहिती मिळवली असता वेगळेच कारण समोर आले असल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादातुन हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांचाच एक मुलगा अमोल पवार त्याच्या एका चुलत भावाबरोबर ज्याचे नाव धनंजय पवार आहे तो गेल्या तीन महिन्यापूर्वी, पेरणी फाटा येथे गेला होता.
तो परतताना त्यांचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये धनंजय पवारचा मृत्यू झाला. परंतु धनंजय पवार यांच्या घरच्यांना संशय आहे की, या सर्व कुटूंबांनी मिळून याच्यावर करणी केली. अन या संशयातूनच या सर्वांची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे.