जे सरकार मंत्रिमंडळ विस्तार करू शकत नाही, ते स्थिर आहे की वैध आहे, असे कसे म्हणता येईल? त्याच्या डोक्यावर अजूनही अपात्रतेची टांगती तलवार आहे. आम्हाला खात्री आहे की 40 पैकी 40 आमदार अपात्र ठरतील. सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला आशेचा किरण आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की, भीती आहे म्हणून मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. असा घणाघात शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना केले आहे.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. ठाकरे गटाचे विधिमंडळात कार्यालय नाही. याबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला होता. अशा प्रसंगातून आपल्याला पुढे जायचे आहे. न्यायालयात लढा सुरू आहे. नाव, धनुष्यबाण कोणी तरी चोरले म्हणून न रडता पुन्हा नवी शिवसेना उभी करण्याचे काम आम्ही करत आहोत. शिवगर्जना हा उपक्रम सध्या सुरू आहे. काल एक वरळीत सभा झाली होती. हजारो लोक जमले होते. संजय राऊत म्हणाले की, चिन्हे आणि नावांशिवाय लोक एकत्र येत आहेत.
त्याचप्रमाणे त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या अटकेचा डाव होता असा जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गौप्यस्फोट केला त्याविषयी विचारले असता राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत. गुवाहाटीला जाऊन आल्यापासून त्यांच्या तोंडाला रक्त लागलं आहे. कुणावरही राजकीय सूडाने कारवाई करायची नाही, असं आमचं धोरण होतं. उद्धव ठाकरे हे संयमी आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री होते.