Nashik Graduate Election : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल काल लागला. यामध्ये सत्यजित तांबे यांच्या विजयाने सर्वच समीकरणे बदलली. कारण फॉर्म भरण्यापासूनच त्यांनी धक्कातंत्र वापरले होते. महाविकास आघाडीचा तगडा उमेदवार असताना आणि ते अपक्ष असताना सत्यजित तांबेंचा विजय झाला. या विजयामागे चार घटक महत्वपूर्ण ठरले असल्याचे एक विश्लेषण सांगते.
१) वडलांची तीन वेळेची आमदारकी व प्रभावी प्रचार यंत्रणा
सत्यजीत तांबे यांचे वडील डॉ.सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर मतदार संघातून तब्बल तीन वेळेला आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांची चांगली पकड या भागात होती. त्याचप्राणे सूक्ष्मनियोजन, प्रचार यंत्रणा आदींमुळे मतदार देखील आकर्षित झाला. अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या पाच जिल्ह्यात तांबेंना माणनारा मोठा वर्ग आहे. त्याचाही फायदा त्यांना झाला.
२) स्वत:ची सक्षम यंत्रणा
सत्यजीत तांबे हे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांचे नेटवर्क स्ट्रॉंग बनले होते. तसेच युवा पिढीमधिं तरुण मतदार त्यांच्या बाजूने होता. तसेच विविध आंदोलने किंवा समस्यांच्या माध्यमातून ते नवमतदारांशी जोडले गेले होते. त्यांना त्या नेटवर्कचा देखील मोठा फायदा झाला.
३ ) भाजपचा पाठिंबा
या निवडणुकीत भाजपने उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे अनेक ठिकाणी भाजपचा छुपा पाठिंबा त्यांना मिळाला. भाजपने कुठल्याही उमेदवारास पाठिंबाही जाहीर केला नव्हता. असे असले तरी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मात्र सत्यजीत तांबेंना पाठिंबा दिला होता. त्यामुळे तांबेंच्या विजयामध्ये भाजपचा देखील महत्वाचा वाटा आहे.
४) राष्ट्रवादीसह काँग्रेसमधील काहींचा पाठिंबा
सत्यजीत तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई काँग्रेसने केलेली असली तरी काँग्रेसमधील तसलेच राष्ट्रवादीमधील काहींनी तांबेंना पाठिंबा जाहीर केला होता. काँग्रेसचे जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरील काही पदाधिकारी याची देखील त्यांना पाठिंबा दिलेला पाहायला मिळाला. स्वतः त्यांच्या संपर्कातील काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांचेच काम केल्याचे बोलले जात आहे.